बारामती | संपादक (शशिकांत खरात)
बारामती कसबा येथील श्रीराम नगर परिसरात नगरपालिकेच्या घंटागाड्यांचा गैरवापर होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. शहरातील घराघरातून कचरा संकलन करणाऱ्या नगरपालिकेच्या घंटागाड्या, कचरा वेगळा करून त्यातून भंगार साहित्य वेचत असल्याचे आणि ते थेट खाजगी भंगार व्यावसायिकांना विकले जात असल्याचे नागरिक सांगत आहेत.
कचरा व्यवस्थापनासाठी नेमलेल्या घंटागाड्या या केवळ कचरा संकलनासाठी असताना, त्यातून प्लास्टिक, लोखंड, टिन, बाटल्या आदी भंगार वेचून विक्री केल्यास हा थेट शासकीय मालमत्तेचा गैरवापर आणि आर्थिक भ्रष्टाचाराचा प्रकार ठरतो.
नियम धाब्यावर?
नगरपालिका कचरा व्यवस्थापन नियमांनुसार, गोळा होणारा संपूर्ण कचरा प्रक्रिया केंद्रात पाठवणे बंधनकारक आहे. मात्र, प्रत्यक्षात काही कर्मचारी व चालक संगनमताने कचऱ्यातील मौल्यवान भंगार वेगळे करून खाजगी भंगार दुकानदारांना विकत असल्याचा आरोप आहे.
नगरपालिका डोळेझाक करतेय का?
हा प्रकार एक-दोन दिवसांचा नसून दीर्घकाळ सुरू असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. असे असताना नगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती नाही, की माहिती असूनही मुद्दाम दुर्लक्ष केले जात आहे? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
दररोज शहरातून मोठ्या प्रमाणात भंगार निघत असताना, त्याचा अधिकृत लिलाव किंवा महसूल नगरपालिकेला न मिळता खाजगी खिशात जात असल्यास नगरपालिकेचे आर्थिक नुकसान लाखोंच्या घरात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नागरिकांची मागणी आहे
घंटागाड्यांची तात्काळ चौकशी, संबंधित कर्मचारी, चालक व भंगार व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करावेत.
CCTV, GPS व अचानक तपासणी सुरू करावी
दोषींवर निलंबन व कडक कारवाई करावी.

✍🏻मुख्य संपादक – शशिकांत खरात








