
बारामती : जनावरांच्या वाहतुकीसाठी आरटीओ परवाना असलेल्या वाहनांना नियमितपणे जनावरांच्या बाजारात वाहतूक करण्याची परवानगी मिळावी, विनापरवाना वाहनांवर कठोर कारवाई व्हावी, तसेच शेतकरी व व्यापाऱ्यांना विनाकारण त्रास देणाऱ्या व्यक्तींवर नियंत्रण आणावे, या विविध मागण्यांसाठी कासम चाचा कुरेशी यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. या संदर्भात दि. 13 ऑगस्ट 2026 रोजी बारामती आरटीओ कार्यालयात आरटीओ अधिकारी श्री. एस. पी. निकम, श्री. गावडे यांच्या उपस्थितीत कासम चाचा कुरेशी यांच्यासमवेत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनांशी संबंधित विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. आरटीओचा वैध परवाना असलेल्या वाहनांना जनावरांच्या बाजारात नियमितपणे वाहतूक करता यावी, तसेच विनापरवाना किंवा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. याशिवाय, काही ठिकाणी बोगस गोरक्षक किंवा कोणताही अधिकृत परवाना नसलेल्या व्यक्तींकडून शेतकरी व व्यापाऱ्यांच्या वाहनांना अडवून विनाकारण त्रास दिला जात असल्याच्या तक्रारींचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला. अशा प्रकारच्या मनमानीमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याबरोबरच सामाजिक व जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याने संबंधितांवर कायद्यानुसार नियंत्रण ठेवण्याची मागणी करण्यात आली.डंपर व ओव्हरलोड वाहनांवर कारवाईची मागणी बारामती शहर व तालुक्यात भरधाव वेगाने तसेच क्षमतेपेक्षा अधिक माल वाहून नेणाऱ्या डंपर, डंपिंग ट्रक व इतर अवजड वाहनांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचा मुद्दाही बैठकीत मांडण्यात आला. या वाहनांमुळे यापूर्वी अनेक अपघात होऊन नागरिकांना जीव गमवावा लागल्याने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर नियमितपणे तपासणी व कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. *विशेषतः परमिटची मुदत संपलेल्या वाहनांवर कारवाई करून अशी वाहने ताब्यात घेण्यात यावीत, अशी मागणी कासम चाचा कुरेशी यांनी केली.* आरटीओकडून सकारात्मक प्रतिसाद या मागण्यांवर आरटीओ प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला. स्टाफची संख्या कमी असल्याने सध्या कामाचा ताण वाढत असला, तरी प्राप्त सूचनांनुसार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आरटीओ अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले.विशेष म्हणजे, बैठकीनंतरही काही वाहनांवर कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर प्रशासनाची नजर राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.बाजार समिती व वाहनमालक संघटनेसोबत बैठक होणार जनावरांच्या वाहतुकीशी संबंधित प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच वाहन चालक-मालक संघटनेच्या प्रतिनिधींसोबत स्वतंत्र बैठक घेऊन पुढील कार्यवाहीची रूपरेषा निश्चित करण्यात येणार असल्याचे आरटीओ प्रशासनाने सांगितले.
या बैठकीमुळे वैध परवाना असलेल्या वाहनधारकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा असून, विनापरवाना व नियमबाह्य वाहतुकीवर आळा बसण्यास मदत होणार आहे.यावेळी आरटीओ अधिकारी, कासम चाचा कुरेशी तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री. गावडे यांच्यासह संबंधित अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.कासम चाचा कुरेशी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जनावरांच्या वाहतुकीपासून ते अवजड वाहनांच्या बेकायदा व धोकादायक वाहतुकीपर्यंत विविध प्रश्न आरटीओ प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आले असून, त्यावर प्रत्यक्ष कारवाई सुरू झाल्याने या पाठपुराव्याला महत्त्वपूर्ण यश मिळाल्याचे मानले जात आहे. यानंतर पोलीस प्रशासन,आरटीओ प्रशासन,चालक मालक संघटना,व कासम चाचा कुरेशी यांच्या शिष्टमंडळासमवेत बैठक घेऊन पुढील रूपरेषा ठरवण्याचे ठरले.

✍🏻मुख्य संपादक – शशिकांत खरात









