
बारामती / संपादक: शशिकांत खरात
बारामती शहरात अलीकडील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. शहरातील विविध भागांमध्ये झाडे तोडली जात असल्याने पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकरणात बारामती नगर परिषदेच्या उद्यान विभागातील अधिकाऱ्यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.नागरिकांच्या म्हणण्यानुसार, काही ठिकाणी कोणतीही स्पष्ट माहिती किंवा फलक न लावता झाडांची तोड करण्यात आली आहे. झाडे तोडण्यास आवश्यक असलेली परवानगी, पंचनामा किंवा त्याबाबतची अधिकृत प्रक्रिया पार पडली का, याबाबतही नागरिकांनी शंका व्यक्त केली आहे.पर्यावरण संवर्धनासाठी झाडांचे महत्त्व मोठे असताना अशा प्रकारे वृक्षतोड होणे गंभीर बाब असल्याचे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले आहे. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य स्पष्टीकरण द्यावे तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.दरम्यान, शहरातील झाडांचे संरक्षण करण्यासाठी प्रशासनाने तत्काळ पावले उचलावीत आणि अनधिकृत वृक्षतोडीवर कठोर कारवाई करावी, अशीही मागणी नागरिकांनी केली आहे.

✍🏻मुख्य संपादक – शशिकांत खरात








