
प्रतिनिधी बारामती :- बारामती शहर व तालुक्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात सुरु असलेल्या बेमुदत उपोषणाला आज १३ वा दिवस उजाडला आहे. मात्र, एवढ्या कालावधीनंतरही अवैध धंद्यांवर ठोस कारवाई न झाल्याने उपोषणकर्त्यांची यांचे वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलनाची घोषणा केली आहे ,
“दगडला पाझर फुटेल पण पोलिस प्रशासनाचे हृदय पाझरणार नाही,” अशा शब्दांत उपोषणकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. बारामती शहर व तालुक्यात मटका, जुगार अड्डे, गांजा विक्री, ताडी, गावठी हातभट्टी, गुटखा, चक्री मटका तसेच ऑनलाइन लॉटरीसारखे अवैध धंदे खुलेआम सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हे धंदे बंद होण्याऐवजी दिवसेंदिवस नव्याने वाढत असल्याचेही उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे.
उपोषणादरम्यान पोलिस प्रशासनाने “अवैध धंदे बंद आहेत” असे लेखी पत्र उपोषणकर्त्यांना दिले होते. मात्र, प्रत्यक्षात हे अवैध धंदे केवळ पोलिसांच्या कागदावरच बंद असून वास्तवात ते सर्रासपणे सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
याशिवाय, उपोषणकर्त्यांनी असा आरोप केला आहे की, त्यांच्या आंदोलनाची पोलिस प्रशासनाकडून चेष्टा करण्यात आली आहे. तसेच अवैध धंद्यांतून हफ्ता गोळा करणारे लोक आणि पोलिस यांच्यात भागीदारी तर नाही ना, असा संशयही उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, उपोषणकर्त्यांची मानसिक प्रकृती ढासळत असतानाही प्रशासनाकडून ठोस निर्णय किंवा कारवाई होत नसल्याने बारामतीत तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणात तात्काळ स्वतंत्र चौकशी करून अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

✍🏻मुख्य संपादक – शशिकांत खरात








