
संपादक / शशिकांत खरात
बारामती : बारामती नगर परिषदेच्या अखत्यारीतील भिगवण चौक परिसरातील कविवर्य मोरोपंत वाचनालय हे विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे अभ्यासकेंद्र मानले जाते. मात्र सध्या या वाचनालयाच्या व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार विद्यार्थी व वाचकांकडून करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, वाचनालय सकाळी आणि संध्याकाळी काही तासच सुरू ठेवले जाते. दिवसभर वाचनालय बंद असल्याने स्पर्धा परीक्षा, शैक्षणिक अभ्यास तसेच इतर वाचनासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे हे वाचनालय दिवसभर सुरू ठेवावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.याशिवाय वाचनालयातील शौचालयांची अवस्था अत्यंत खराब झाल्याचा आरोपही विद्यार्थ्यांनी केला आहे. गेल्या महिनाभरापासून स्वच्छता योग्य प्रकारे होत नसल्याने वाचनालयात येणाऱ्या वाचकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्वच्छता व देखभाल याकडे संबंधित विभागाने तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.वाचनालयात येणाऱ्या वाचकांची नोंद ठेवण्यासाठी असलेले रजिस्टरही नियमितपणे भरले जात नसल्याची तक्रार समोर आली आहे. किती वाचक येतात, किती वेळ अभ्यास करतात याची अचूक नोंद न ठेवल्यामुळे व्यवस्थापनातील त्रुटी वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.विद्यार्थी व नागरिकांनी बारामती नगर परिषद प्रशासनाला आवाहन केले आहे की, वाचनालयातील स्वच्छता, शौचालय दुरुस्ती, नियमित देखभाल आणि नोंदवहीचे व्यवस्थापन याकडे तातडीने लक्ष द्यावे. तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी कविवर्य मोरोपंत वाचनालय दिवसभर खुले ठेवण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी :
1)वाचनालय सकाळपासून रात्रीपर्यंत दिवसभर सुरू ठेवावे.
2)शौचालयांची तातडीने दुरुस्ती व स्वच्छता करावी.
3)वाचनालय परिसराची नियमित साफसफाई करावी.
4)वाचक नोंदणी रजिस्टर नियमितपणे भरले जावे.
5)विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अधिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
विद्यार्थ्यांच्या या मागण्यांकडे बारामती नगर परिषद प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

✍🏻मुख्य संपादक – शशिकांत खरात








