बारामती/ संपादक शशिकांत खरात
बारामती शहरातील नगरपालिका हद्दीतील स्मशानभूमीत काही लोकांनी बेकायदेशीरपणे संसार थाटून वास्तव्यास सुरुवात केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या लोकांकडे राहण्याबाबत नगरपालिकेची कोणतीही अधिकृत परवानगी नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.
माहितीनुसार, स्मशानभूमीत राहणाऱ्या व्यक्तींकडून मयत व्यक्तीचे अंत्यसंस्कार करण्यासाठी येणाऱ्या कुटुंबीयांकडून अव्वाच्या सव्वा रक्कम उकळली जात असल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे. या लोकांकडून ना घरपट्टी भरली जाते, ना पाणीपट्टी भरली जाते, तसेच त्यांना स्मशानभूमीच्या देखरेखीचे कोणतेही अधिकृत आदेश देखील देण्यात आलेले नाहीत, असे सांगितले जात आहे.यामुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
जर नगरपालिकेने स्मशानभूमीचा ठेका दिलेला नाही,कोणतीही निविदा प्रक्रिया राबवलेली नाही,आणि कोणालाही अधिकृत परवानगी दिलेली नाही,तर स्मशानभूमीत हा कारभार कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे? स्थानिक नागरिकांमध्ये अशीही चर्चा आहे की काही नगरसेवकांचे या प्रकाराला पाठबळ असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात काहींचे आर्थिक हितसंबंध तर नाहीत ना..? असा सवाल देखील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
स्मशानभूमी ही सार्वजनिक आणि संवेदनशील जागा असताना तिथे अतिक्रमण करून वास्तव्यास राहणे आणि अंत्यसंस्कारासाठी पैसे उकळणे हा गंभीर प्रकार असल्याचे नागरिकांचे मत आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.स्थानिक नागरिकांनी नगरपालिकेकडे खालील मागण्या केल्या आहेत :
स्मशानभूमीत राहणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करावी.स्मशानभूमीतील सर्व अतिक्रमण तात्काळ हटवावे.अंत्यसंस्कारासाठी घेतल्या जाणाऱ्या बेकायदेशीर वसुलीची चौकशी करावी.
जर कोणत्याही नगरसेवक किंवा अधिकाऱ्यांचा संबंध आढळला तर त्यांच्यावरही कारवाई करावी.
दरम्यान, या प्रकरणामुळे नगरपालिकेच्या प्रशासनावरही मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरातील स्मशानभूमीसारख्या संवेदनशील ठिकाणी असा प्रकार सुरू असताना प्रशासन नेमके काय करत आहे, असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.आता या प्रकरणात प्रशासन कठोर कारवाई करते की प्रकरण दडपले जाते, याकडे बारामतीकरांचे लक्ष लागले आहे.

✍🏻मुख्य संपादक – शशिकांत खरात
























