
शेतकरी मरतोय… आणि बारामतीत कृषी विज्ञान केंद्रांच्या नावाखाली कोणाचे खिसे भरले जात आहेत?
तालुक्यात दरवर्षी मोठ्या थाटामाटात कृषी विज्ञान केंद्र, कृषी मेळावे व कृषी प्रदर्शनांचे आयोजन केले जाते. मंचावर विकासाच्या गप्पा रंगतात, आधुनिक शेतीचे गोडवे गायले जातात; मात्र याच तालुक्यात शेतकरी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करत असल्याचे भयावह वास्तव समोर आहे.
शेतकऱ्यांच्या नावावर होणाऱ्या या कार्यक्रमांतून नेमका फायदा कोणाला होतो, असा थेट सवाल उपस्थित होत आहे. स्टॉल्स, जाहिराती, बियाणे-खते कंपन्यांचे प्रायोजकत्व आणि सरकारी अनुदान यातून लाखो-कोट्यवधींची उलाढाल होते. पण या झगमगाटात शेतकऱ्यांच्या जीवनात प्रत्यक्ष काय बदल झाला, याचे उत्तर कुणी देणार?
ज्या शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही, पीक विमा वेळेवर मिळत नाही, वीज-पाणी आणि उत्पादन खर्चाचा ताण वाढतोय, त्यांच्यासाठी हे कृषी विज्ञान केंद्र उपयोगी ठरत आहेत का, की फक्त आयोजक व ठराविक कंपन्यांसाठी ‘कमाईचे केंद्र’ बनले आहेत, हा गंभीर प्रश्न आहे.
शेतकरी अडचणीत असताना कृषी विकास केवळ व्यासपीठांपुरता आणि प्रदर्शनांपुरता मर्यादित राहतोय का? शेतकरी आत्महत्या रोखण्यात हे कार्यक्रम अपयशी ठरत असतील, तर त्यांच्या आयोजनावर, खर्चावर आणि परिणामांवर चौकशी व्हायलाच हवी.
आज बारामतीतील शेतकरी एकच प्रश्न विचारतोय—
“आम्हाला जगण्यासाठी आधार कधी मिळणार, की कृषीच्या नावाखाली फक्त काहींचे खिसेच भरले जाणार?”


✍🏻मुख्य संपादक – शशिकांत खरात
























